Friday, January 24, 2014

"मास्टर प्लॅन" ही कथा "लोकप्रभा"त प्रकाशित



माझी "मास्टर प्लॅन" ही कथा साप्ताहिक "लोकप्रभा" च्या २४ जानेवारी २०१४ आणि ३१ जानेवारी २०१४ या अंकांतून दोन भागांत प्रकाशित झाली आहे.


मास्टर प्लॅन - पूर्वार्ध : http://issuu.com/lokprabha/docs/24_january_2014_issue_for_website

पान क्रमांक ४२,४३ आणि ५३

मास्टर प्लॅन - उत्तरार्ध :  http://issuu.com/lokprabha/docs/31_january_2014_issue_for_website

पान क्रमांक ४६, ४७ आणि ४८

Tuesday, January 14, 2014

मिडियाची घसरलेली पातळी



मराठी मिडियाला अशा बातम्यांचं काहीच सोयर-सुतक नसतं. कारण मराठी मिडिया आजही जातीय राजकारण आणि पक्षीय राजकारण याच्यातच अडकला आहे. खर्‍या बातम्या यांना लोकांपर्यंत येऊच द्यायच्या नसतात का त्यांच्यातली खरी पत्रकारिता संपत चालली आहे ? हे वादाचे मुद्दे आहेत. पण आपल्या मिडियातील लोकांनी जुन्या काळातली पत्रकारिता कशी चालत होती आणि आता आपण काय करत आहोत हे खरोखर तपासून बघायची गरज निर्माण झालेली आहे. उदाहरणार्थः मुंबईच्या मिडियाला मुंबई सोडून इतर महाराष्ट्राविषयी दखल घेण्याएवढी ठळक (म्हणजे बलात्कार, स्टींग, इत्यादी सनसनाटी विषय) बातमी नसेल तर फारसा रस नसतो. तर पुण्याच्या मिडियात मुंबईच्या बातम्या नसतात. उरलेला अवघा महाराष्ट्र कोणी मोजतच नाही. कोणतेही चॅनेल बघा, मुंबई - पुणे, एवढेच. बाकी महाराष्ट्र फक्त या गावात शेतकर्‍याने आत्महत्या केली. या तालुक्यात उसाच्या भावावरुन जाळपोळ झाली, कोल्हापूरात टोलनाक्यावर जाळपोळ झाली, अमक्या गावात चिमुकलीवर बलात्कार झाला. तर कोठे विवाहितेला हुंड्यावरुन जाळलेले असते.

महाराष्ट्रातील कोणत्या गावांतून लोक उपाशी राहतात?
सरकारी योजना कोणत्या गावात आल्याच नाहीत?
सरकारी कर्मचारी लोकांना कशा वाटाण्याच्या अक्षता लावतात?
गरीबांना शिक्षणाच्या योजना असूनही त्यातील पैसे नेते आणि नोकरशहा संगनमताने कसे वाटून खातात?
कितीतरी लाखांवर विहिरी कागदोपत्री खणून त्याचे पैसे दिले गेले पण त्या विहिरींचा लाभ गावांना का मिळाला नाही?
जनप्रतिनिधी पदांचा दुरुपयोग करुन कसे सरकारी नियम पायदळी तुडवून लोकांची कामे पैसे घेऊन करुन देतात?
लहान मुलांना शिक्षण किती निकृष्ट दर्जाचे मिळते?
चॅरिटेबल ट्रस्ट खोर्‍याने पैसे गोळा करतात त्यातील किती पैसे योग्य कामासाठी वापरले जातात?

असे हजारो संवेदनशील मुद्दे आहेत. पण मराठी सन्मान स्वतःतच नसलेल्या (अगदीच अपवादात्मक स्वरुपात असलेल्या) मराठी मिडियाला जर वरील मूलभूत मुद्द्यांची दखल घेता येत नसेल तर भविष्यकाळ आपल्या सर्वांसाठीच अंधारमय आहे. मिडियाने सर्वात आधी क्रिकेट खेळाडू, राजकारणी नेते, गुन्हेगार, चित्रतारका यांना देण्यात येणारी वारेमाप प्रसिद्धी आधी बंद केली पाहिजे. पण हे टीआरपीचे ग्लॅमर कोणताही मिडिया सोडत नाही, म्हणून मूळ प्रश्न कायमच लटकलेले राहतात. मिडियाला त्यांच्या जबाबदारीची जाणीवच आता उरलेली नाहिये. मिडियाला चौथा स्तंभ का म्हणतात हे खरोखर ज्याला कळाले तो खरा हाडाचा पत्रकार.

Sunday, January 5, 2014

पुढील ५० वर्षांनी मराठी नामशेष होणार?

आजच साहित्य संमेलनाची सांगता झाली आणि या संमेलनाचे कौतुकसोहळे पुढील कित्येक दिवस गायिले जातील. साहित्य चपराकचे संपादक श्री. घनःश्याम पाटील यांनी जानेवारी २०१४ च्या अंकात संपादकीय मधे पुढील विचार मांडले आहेत,



त्या अनुषंगाने मी मांडलेले विचार

घनश्यामजी हा खरोखर जटील मुद्दा आहे. तुमचे आभार की या महत्त्वाच्या संपादकीयावर मी विचार व्यक्त करावेत अशी आपण इच्छा व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाणांनी तेव्हाच्या राजकारण्यांना एक आदर्श निर्माण करुन दिला होता पण इतिहासातील चुकांमधून शिकणे हे आपल्या मातीतच नाहिये हे वारंवार सिद्ध झालेले आहे. त्याच प्रमाणे यशवंतराव चव्हाणांनंतरच्या राजकारण्यांनी एकही क्षेत्र सोडले नाही जे समाजमनाशी वा समाजभावनेशी जवळून निगडीत आहे. मग ते क्रिकेट असो, साहित्य असो, चित्रपट माध्यम असो, शिक्षण असो, जात-पात असो वा अन्य इतर. समाजाच्या मनावर परिणाम करणारे घटक आपल्या ताब्यात ठेवले की समाजमन आपल्याला हवे तसे वळवता येते असा त्यांचा एक गैरसमज आहे. राजकारण्यांच्या या अजाणतेपणामुळे काय नुकसान होते आहे हे त्यांच्या लक्षात येणे अवघडच आहे.

- भाषेचा र्‍हास
- सृजनशीलतेचा र्‍हास
- बुद्धीमत्तेचा र्‍हास
- परंपरेचा र्‍हास
- समानतेच्या भावनेचा र्‍हास
- दुसर्‍याच्या कष्टांचा सन्मान करणार्‍या भावनेचा र्‍हास , इत्यादी अनेक आहेत.

समाज व्यक्त करत नाही म्हणजे ती भावना त्याच्यात नसतेच असे नाही. असंतोष हा कायम खदखदत राहतो आणि एक दिवस त्याचा भडका उडतोच उडतो.

मला व्यक्तीशः असे वाटते की - आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा राजकारण्यांना जागेवर आणण्यासाठी साहित्यिक मोठे विचार देण्याचे काम करतात. हे जर राजकारण्यांना मान्य असेल तर - राजकारण्यांनी व्यासपीठ साहित्य क्षेत्रातील मान्यवरांसाठी मोकळे ठेवावे व स्वतः खाली इतर प्रेक्षकांबरोबर बसावे. फार तर व्हीआयपी म्हणून त्यांना पुढील जागा देण्यास हरकत नसावी. साहित्य हे तेव्हाच खर्‍या अर्थाने साहित्याच्या दर्जाचे राहते जेव्हा साहित्यिक राजकारण्यांपुढे लोटांगण घालणे बंद करतील. राजकारणी कितीही मोठा नेता झाला तरी तो साहित्य संमेलनाच्या ठिकाणी एक सामान्य वाचकच असतो. समाजमनाचे प्रतिनिधित्त्व करण्याच्या जबाबदारीने या राजकारण्यांनी आपापले साहित्य क्षेत्रातील अनुभव जरुर सांगावेत. साहित्यामुळे त्यांना काय प्रेरणा मिळाल्या? सध्याचे साहित्य किती खालच्या वा वरच्या पातळीवर गेलेले आहे याबद्दलची परखड मते (प्रामाणिकपणे) त्यांनी मांडली पाहिजेत. साहित्य क्षेत्रातील निर्मितीमधला जिवंतपणा व सृजनशीलता टिकवायची असेल तर घालीन लोटांगण वंदीन चरण ही प्रवृत्ती साहित्य क्षेत्रातील सर्वच साहित्यिकांनी सोडली पाहिजे. जे चांगले आहे त्याला (जात-पात, रंग-रुप, कोणताही कंपूबाजीपणा न करता) निर्भेळपणे चांगले सर्वजण म्हणू लागतील तो दिवस साहित्य क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल. असे झाले तरच आपली मराठी खर्‍या अर्थाने माय मराठी म्हणून पुढची हजार वर्षे जगात स्वतःचे अस्तित्त्व टिकवू शकेल. अन्यथा पुढील ५० वर्षांनी मराठी वाचणारे एन्टिक पीस म्हणून सापडतील. साहित्यिकांनी स्वतः साहित्य क्षेत्रात हे भान व ही जबाबदारी टिकवणे अत्यंत गरजेचे म्हणूनच आहे. सांगावे तितके कमीच आहे. पण तूर्तास ही लेखणी इथे थांबवतो.