Sunday, December 26, 2021

अभी अभी बना हूं इंसान

विख्यात कवी आणि गीतकार मनोज मुंतशीर  यांच्या हिंदू कट्टरपंथी विचारधारेच्या ट्विट केलेल्या कमेंट बघून सुचलेल्या ओळी  

कुछ अभी अभी नए हिंदू हुए है ।
तो कुछ हो गए है नए मुसलमान ।
इनकी वजह से आज आंखे खुली है ।
मैं भी अभी अभी बना हूं इंसान ।।


कलम की आजादी अब हिंदू हो गई है ।
प्यार की आजादी अब लव जिहाद बनी है ।
इंसान के अंदर सोच का शैतान बसा है ।
और बदनाम धर्म को किया जा रहा है ।।

- सागर
🙏

Sunday, December 12, 2021

सिटीझन अमेंडमेंट बिलाचे पडद्यामागचे सत्य

सिटीझन अमेंडमेंट बिलावर समीर गायकवाड यांनी लिहिलेला खालील लेख अवश्य वाचा...आपण कोठून कोठे नेले जात आहोत यावर गांभिर्याने विचार करावा. जेंव्हा तुम्हालाही तुम्ही या देशाचे नागरिक आहात हे कागदोपत्री सिद्ध करावे लागेल तेंव्हा आजची उन्मादी प्रतिक्रिया कशात बदलेल हे तुम्हीच ठरवा. 

.....

संसदेत एका महत्वाच्या विधेयकावर चर्चा सुरु आहे. सिटीझनशिप अमेंडमेंट बिल (CAB).
हे विधेयक म्हणजे दाखवायचे दात आहेत आणि खायचे दात म्हणजे एनआरसी आहे (नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटिझनशिप NRC - नागरिकत्वाची राष्ट्रीय नोंद)
हे कसे ते पाहुयात -
आपल्या देशाचे नागरिकत्व कुणाला द्यायचे याच्या मसुद्यात सुधारणा करणारं विधेयक असं या CAB बद्दल ढोबळमानाने म्हणता येईल.

देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी काही अटी आहेत जसे की त्या व्यक्तीचा भारतात जन्म झालेला असावा वा त्याच्या जन्मदात्यापैकी एकाचा जन्म भारतात झालेला असावा किंवा ज्याचा सामान्यतः अकरा वर्षांचा रहिवास पूर्ण असावा. या खेरीज फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून भारतात विस्थापित झालेल्या लोकांसाठी काही उपकलमे आहेत.

आता या महत्वाच्या विधेयकाद्वारे नागरिकत्व बहाल करण्याच्या अटीत दुरुस्ती केली जातेय.
काय आहे ही दुरुस्ती -
या दुरुस्तीनुसार देशात त्या हिंदू, शीख, पारशी, बुद्ध, जैन आणि ख्रिश्चन धर्मीय लोकांना नागरिकत्व मिळेल जे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून आलेले असतील. या खेरीज ११ वर्षे रहिवासाची अट शिथिल करून ६ वर्षे करण्याची शिफारस यात आहे.
आता यात केवळ मुस्लिमांना सरकारने वगळले आहे.

सरकारचा यावरचा युक्तिवाद असा आहे की या तीनही देशात मुस्लिम बहुसंख्यांक आहेत आणि अन्य धर्मीय अल्पसंख्यांक आहेत त्यामुळे या देशातील मुस्लिम व्यक्तींना नागरिकत्व देण्यात काही हशील नाही.

तर विरोधकांचे म्हणणे आहे की न्याय सर्वाना समान लावला पाहिजे, त्या देशातल्या एका ठराविक धर्माच्या व्यक्तीस सोडून तुम्ही अन्य धर्मीयांना नागरिकत्व देऊ नये. खेरीज धर्म पाहून नागरिकत्व देणे हे घटनाबाह्य आहे, घटनेतील तरतुदीनुसारच नागरिकत्व दिले जावे.
विरोधकांच्या युक्तिवादावर सरकार प्रतियुक्तिवाद करताना मागील दाखले देत आहे. जसे की बांगलादेश निर्मितीच्या वेळेस इंदिरा गांधी यांच्या सरकारने काही लाख लोकांना भारताचे नागरिकत्व बहाल केलं. तर एलटीटीईच्या विद्रोहप्रसंगी श्रीलंकेतून आलेल्या निर्वासितांना नागरिकत्व देण्यात आलं.

सरकारकडे बहुमत आहे आणि त्याच्या जोरावर हे विधेयक दोन्ही सदनात मंजूर होईल हे उघड सत्य आहे.
विरोधकांचे म्हणणे आहे की हे विधेयक संमत झाल्यास घटनेच्या १४ व्या आणि १५ व्या कलमाचे उल्लंघन होईल.
या दोन्ही कलमांचा गोषवारा थोडक्यात असा आहे -
Article 14 of Indian Constitution states that “The state shall not deny to any person equality before the law or the equal protection of the laws within the territory of India.”
Article 15 of Indian Constitution Explained - “the state shall not discriminate against any citizen on grounds only of religion, race, caste sex, places of birth or any of them".
१४ वं कलम सांगतं की कायद्यापुढे सगळे सामान आहेत. सर्वांना कायद्याचे समान संरक्षण असेल.
१५ वं कलम सांगतं की धर्म, वंश, जाती, लिंग, जन्मस्थळ यांच्या आधारे भेद करता येणार नाही.
यावर सरकार सांगतं की ही कलमे भारतातील सर्व नागरीकांना लागू असतील यात कुठलाही भेदभाव केलेला नाही. आम्ही हा पाया बदललेला नाही तो आहे तसाच ठेवत आहोत.

तर मेख इथे आहे.
घटनेच्या तरतुदी भारतीय नागरीकांना लागू होतात.
आपण या देशाचे नागरिक आहोत हे आपल्याकडील शासकीय नोंदी आणि डोमिसाईलच्या कागदपत्रांवरून सिद्ध होते.
सरकारचे धोरण आहे की संपूर्ण देशात २०२४ पर्यंत एनआरसी राबवायची आहे : नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटिझनशिप - नागरिकत्वाची राष्ट्रीय नोंद
हे का गरजेचे आहे हे सांगताना सरकारचा युक्तिवाद आहे की देशातील घुसखोर शोधून काढून जे भारतीय नागरिक आहेत त्यांनाच ठेवून घ्यायचे आहे आणि नागरिक नसलेल्या लोकांना / घुसखोरांना हाकलून द्यायचे आहे.
घुसखोरीच्या मुद्दयांवर पूर्वोत्तर राज्यातले राजकारण चालत आलेय. त्यातही आसाम यामध्ये होरपळून निघाला आहे.

आसाममध्ये एनआरसी लागू केली गेलं तेंव्हा त्याचा आधार होतं घटनेतील परिशिष्ट ६ अ -
Section 6A says all Indian origin persons, including from Bangladesh who entered Assam before January 1966, are deemed citizens. Those who came between January 1, 1966, and March 25, 1971, can also get citizenship after registering themselves and living in India for 10 years. Everyone who entered after March 25, 1971, is to be identified as foreigner by the Tribunals and deported.

एकट्या आसाममध्ये लागू झालेल्या एनआरसीच्या यादीत दोन वेळा पुनःतपासणी झाल्यानंतर नऊ लाखाहून अधिक लोक सध्याच्या नागरिकत्वाच्या व्याख्येनुसार अपात्र ठरत आहेत. यात सर्व धर्माचे लोक आहेत. यांचे जीवन दोलायमान झालेलं आहे.
आताचे संसदेत मांडले गेलेले CAB विधेयक मंजूर झाले तर आसाममध्ये काय होईल याचे उत्तर असे येईल - या नऊ लाख लोकानांपैकी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या हिंदू, शीख, पारशी, बुद्ध, जैन आणि ख्रिश्चन धर्मीय लोकांना नागरिकत्व मिळेल. म्हणजेच या देशातून आलेल्या मुस्लिमाना नागरिकत्व मिळणार नाही. या नऊ लाखाहून अधिक असलेल्या लोकांत पाच लाख चाळीस हजार बांगलादेशी हिंदू आहेत, त्यांना सहज नागरिकत्व मिळेल. यात स्पष्ट आहे की उरलेल्या लोकांतील मुस्लिम वगळता सर्वांना नागरिकत्व मिळेल.

विरोधकांचा घटनाबाह्यतेचा आरोप खोडताना सरकारकडून युक्तिवाद होतोय की देशाचे नागरीक असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीबद्दल आम्ही भेदभाव करत नाही परंतु जे या देशाचे नागरीक सिद्ध होत नाहीत त्यांना देशाचे संविधान लागू होत नसल्याने धर्माधारित भेदभावाचा प्रश्नच येत नाही.

इथे मेख अधिक स्पष्ट होते. वर उल्लेखलेल्या ३ देशातील मुस्लिम वगळता अन्य नोंदीत धर्मीयांना नागरिकत्व द्यायचे, ज्यांचा रहिवास सहा (प्रस्तावित बदलानुसार) वर्षांहून अधिक असेल त्या सर्वांनाच नागरिकत्व द्यायचे मात्र ज्यांचा रहिवास याहून कमी काळाचा असेल त्यातील मुस्लिम वगळता इतरांना नागरिकत्व द्यायचे. थोडक्यात जे मुस्लिम सहा वर्षाहून कमी काळासाठी भारतात रहिवास करून आहेत आणि ज्यांच्याकडे एनआरसीमध्ये नोंद होण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे नसतील अशा सर्व लोकांना देश सोडावा लागेल. नागरीकांना समान न्याय देत असून जे नागरीक नाहीत त्यांचा प्रश्नच नाही असा हा मामला आहे. मात्र नागरीक ठरवण्यासाठी मुस्लिम वगळण्याची जी मेख आहे ती केवळ नागरिकत्व बहाल करण्यापुरती नसून ती प्रामुख्याने एनआरसीसाठी शस्त्र म्हणून वापरली जाईल.

संपूर्ण देशात जेंव्हा एनआरसी राबवली जाईल तेंव्हा देशभरातील मुस्लिम वगळता अन्य धर्मीय जे उपरोक्त तीन देशातून आले आहेत त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही. मात्र ज्या मुस्लिमांचे नाव एनआरसीत येणार नाही त्यांना देश सोडावा लागेल.
CAB च्या दृष्टिकोनातून पाहू जाता हा मुद्दाच समोर येत नाही मात्र एनआरसीच्या नजरेतून पाहिले की यात मुस्लिमांशी उघडपणे भेदभाव केल्याचे दिसून येते.
ज्या ईशान्येकडील राज्यांपायी हे सगळं केलं गेलं तिथले लोक मात्र एनआरसी आणि CAB दोन्हीवर नाराज आहेत. मणिपूरची अंतर्गत परवाना पद्धत जारी राहील असं सांगत त्यांना यातून वगळलं आहे. आसाममध्ये मात्र या दोन्ही बाबींवरून प्रचंड असंतोष आहे. तिथे लोक रस्त्यावर आलेत पण आपल्या मीडियाने त्यांचे आणि त्यांच्या सबस्क्राईबर्सचेही डोळे झाकलेत.

काय हवं होतं -
भारतात नागरिकत्व देताना त्या व्यक्तीने त्याच्या मूळ देशात काय पराक्रम गाजवला आहे, तो कर्जबाजारी आहे का, त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत का, त्याने आर्थिक घोटाळे केले आहेत का, त्याला कुठले आजार रोग वगैरे आहेत का, त्याची सामाजिक पार्श्वभूमी कशी आहे, त्याला आपल्या देशात कशासाठी यायचे आहे, त्याला नागरिकत्व देण्याने देशाचे कोणते नुकसान होते आहे का, तेढ निर्माण होते आहे का, इथे तो कायम राहणार आहे का, इथल्या साधनसंपत्तीचा उपभोग घेऊन तो माघारी जाणार आहे का अशा अनेक बाबी तपासून त्याचे हेतू, उद्दिष्ट यांची कठोर चिकित्सा होऊन त्याला नागरिकत्व दिले जाणे अपेक्षित आहे. तो गैरमुस्लिम आहे म्हणून त्याला दारे उघडी करण्यातही अर्थ नाही आणि तो मुस्लिम आहे म्हणून त्याला अडवण्यात अर्थ नाही. मुळात आपल्या देशातील साधनसंपत्ती किती आहे, आपल्याकडे लोकसंख्येचा भस्मासुर तोंड काढून उभा आहे, रोजगारापासून ते जीवनविषयक मूलभूत गरजांच्या उपलब्धतेपर्यंत आपण प्रचंड पिछाडीवर आहोंत. आपली अर्थव्यवस्था उतरत्या आलेखात आहे. पाश्चात्य देशात जिथे मुबलक साधनसंपत्ती आणि भौतिक मूलभूत गरजा भागवणं सहज शक्य असूनही तिथे नागरिकत्व देताना अनेक कठोर कसोट्यांचे नियम लावले जातात त्या नंतर मग कुठे नागरिकत्व मिळते. आपण या सर्व न्याय्य मुद्द्यांना हरताळ फासून केवळ धर्माच्या आधारे नागरिकत्व देणार असू तर त्याने केवळ धार्मिक तेढ वाढत जाईल. वरील तीन देशात अल्पसंख्यांकांना वाईट वागणूक मिळते ज्यांच्यासाठी आमच्या मनात सहानुभूती आहे म्हणून आम्ही त्यांना आपली दारे खुली करत आहोत आणि मुस्लिम हे तिथलं बहूसंख्यांक आहेत म्हणून आम्ही त्यांना नाकारत आहोत हा वरवरचा भाग आहे, या खाली दडली आहे एनआरसीत अपात्र ठरलेल्या केवळ मुस्लिमांनाच या देशातून हाकलून लावण्याची नीती. CAB विधेयक दोन्ही सदनात मंजूर होईलच. त्या नंतर देशभरात एनआरसीचे काम सुरु होईल. मग या देशात एकच मुख्य मुद्दा चर्चेत उरेल तो म्हणजे हिंदू मुस्लिम भेदभाव. हिंदूंना वाटेल की हे सरकार आपलेच आहे आणि मुस्लिमांना वाटेल की हे आपला द्वेष करतात. कित्येक दशके इथे राहिलेल्या एनआरसीत अपात्र ठरलेल्या मुस्लिमांना कुठे पाठवणार ? ज्या देशात यांची रवानगी करायची आहे त्यांनी यांना नाकारल्यास त्यांनी कुठे ठेवणार ? आजघडीला मागील दहा वर्षापासून सुरु असलेल्या आसाममधील सिल्चर येथील डिटेन्शन कॅम्पमध्ये ३५ बाय २५ फुटांच्या खोलीत २५ माणसं या हिशोबाने कोंबण्यात आलेल्या खुराड्यात हजारो माणसांची जी अवस्था झालीय तिच यांची ही होईल. हे सर्व घडत असताना देशातील शांतता आणि शासनव्यवस्था पणाला लागेल, या लोकांना सांभाळण्याचा आर्थिक बोजा पडेल. महत्वाचे म्हणजे गेले कित्येक वर्षापासूनचा हिंदूमुस्लिम भाईचारा धोक्यात येऊन राष्ट्रीय एकात्मकतेची वीण उसवत राहील.

इतकं महत्वाचं विधेयक मांडलं जात असताना त्यावर देशात साधक बाधक चर्चा न होता निम्म्याहून अधिक लोक आपल्या स्वमग्नतेच्या कोषात दंग आहेत तर अन्य बहुसंख्य धार्मिक उन्मादात व्यग्र आहेत. नोटबंदीच्या काळात नेमके हेच झाले होते, अशाच स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत होत्या. तेंव्हा समर्थन करणारे आता मिठाची गुळणी धरून असतात. आताही तेच होते आहे. विरोधाचा आवाज क्षीण आहे. काहींची बालिश भूमिका अशी आहे की नेपाळ आणि श्रीलंकेत मुस्लिम अल्पसंख्य आहेत त्यांनाही या नागरिकत्वाची खिरापत देण्यात यावी. या देशात कुणाला हिंदूंचा मसीहा व्हायचंय तर कुणाला मुस्लिमांचा तारणहार व्हायचं आहे त्यासाठीची ही रस्सीखेच आहे आणि ही रस्सी तुमच्या आमच्या गळ्याला आवळली जाणार आहे हे माहिती असूनही आपण निवांत बसून आहोत. कुठल्याही धर्माच्या नागरिकासाठी काहीही शिथिल वगैरे केले जाऊ नये. कुणाचेही फाजील लाड केले जाऊ नयेत, नागरिकत्व देताना धर्म हा आधार न मानता देशहित हा आधार मानला जावा ही भूमिका असायला हवी. आपल्याच देशाच्या नागरिकत्वासाठी महत्वाचे बदल असणारं एक विधयेक मांडलं जातंय आणि बहुसंख्य जनता कुंभकर्णी निद्रेत आहे. ही अनास्था या देशाला कधी तरी नक्की महागात पडेल.

- समीर गायकवाड Sameer Gaikwad

Wednesday, November 10, 2021

" जय श्री राम" आणि "जय भीम"

" जय श्री राम" आणि "जय भीम"
जय श्रीराम आणि जय भीम हे फक्त शब्द नाहीत किंवा फक्त कोणत्या घोषणा नाहीत. या दोन भिन्न, विरुद्ध टोकाच्या विचारधारा आहेत. 
मी स्वतः एक हिंदू आहे मात्र मी आयुष्यात कधीही कुणाला जय श्रीराम म्हटलो नाही. याचे सोपे कारण म्हणजे मला ही घोषणा कधीही आपलीशी वाटली नाही. ही घोषणा सर्व हिंदूंचे प्रतिनिधित्व करत नाही. तर फक्त काही कट्टरवादी, ब्राह्मण्यवादी लोकांचे प्रतिनिधित्व करते. या घोषणेला सर्व हिंदुंच्या माथी मारणे हेच या कट्टरवाद्यांचे काम. 
जय श्रीराम ही घोषणा वरकरणी रामाशी निगडीत वाटत असली धर्माशी निगडित वाटत असली तरी ती फसवी आहे.
ती एक द्वेष पसरवणारी, विभाजनकारी, कट्टरवादी विचारधारेचे प्रतिनिधित्व करते.
विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षा सारखा राजकीय पक्ष आणि त्याच्या कट्टरवादी संघटना म्हणजेच बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद वगैरेच या घोषणेचा वापर करतात.
ही विचारधारा वरकरणी मुस्लिम विरोधी वाटत असली तरी
हा फक्त या विचारधारेचा मुखवटा आहे.
तिच्या अंतरंगात मात्र तीन स्पष्ट चेहरे दडलेले आहेत.
पहिला प्रचंड भांडवलवादी चेहरा. जिथे आर्थिक नाड्या फक्त काही ठराविक लोकांच्या हातात असतील. जे नागरिकांना गरीब बनवून त्यांना गुलामगिरी कडे घेऊन जातील. गरीब कामगारांचे शोषण करणार आहे. एक शोषित, पीडित, गुलाम समाज बनवणे या चेहऱ्याचे अंतिम ध्येय.
दुसरा चेहरा प्रचंड जातीयवादी आहे.
जो मनुवादावर आधारित समाज उभारू इच्छितो.
जिथे उच्चवर्णीयांचे साम्राज्य असेल. राजकीय सत्ता फक्त तेच उपभोगतील. सत्ताकेंद्र त्यांच्याच अवतीभवती फिरत राहिल आणि मागासवर्गीयांवर अत्याचार करण्याचा हक्क त्यांना प्राप्त होईल.
जिथे प्रचंड विषमता असेल. 5% लोक 95 % लोकांवर राज्य करतील.
आणि तिसरा चेहरा म्हणजे कट्टर पुरुष प्रधानता.
जिथे स्त्री म्हणजे फक्त उपभोगाची वस्तू असेल.
तिला काहीही किंमत राहणार नाही.
स्त्रियांना हवी तशी उपभोगण्याचा हक्क त्या पुरुषांना प्राप्त
होईल. शिक्षण, स्वातंत्र्य, समता, राजकारण वगैरे स्त्रियांचे सर्व हक्क हिरावून घेण्यात येतील.
अशा या तीन चेहऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी विचारधारा म्हणजे जय श्रीराम.
ही विचारधारा हिंदुत्ववाद्यांची आहे, हिंदूंची नाही.
हे प्रत्येक हिंदूने लक्षात घ्यायला हवे.
म्हणून तिला व्यापक न होऊ देता हिंदुत्ववाद्यांपर्यंत सिमीत ठेवणे हे आपले ध्येय असायला हवे. 

दुसरीकडे या विचारधारेच्या अगदी विरुद्ध टोकाला "जय भीम" ही विचारधारा आहे. 
जय भीम ही व्यक्तीकेंद्रीत किंवा जाती केंद्रित व्यवस्था नाही.
ती सर्वव्यापक, सर्वसमावेशक विचारधारा आहे.
"जय भीम" म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता.
जिथे जय श्रीराम या विचारधारेला विषमता हवी आहे तिथे जयभीम या विचारधारेला समता नांदवायची आहे.
जाती, धर्म, लिंग, प्रांत, भाषा या सर्वांच्याच समतेसाठी जय-भीम विचारधारा कसोशीने प्रयत्न करते. 
जिथे समता असते तिथेच एकता असते, तिथेच शांतता नांदते.
"प्रेम, सद्भाव, भाईचारा, समता, बंधुता, स्वातंत्र्य, शांतता असणारा समाज निर्माण करणे" हे जय भीम विचारधारेचे अंतिम ध्येय. 

जय श्रीराम ही विचारधारा तुम्हाला अराजकतेकडे घेऊन जाते
तर जय भीम विचारधारा तुम्हाला शांततेकडे घेऊन जाते.

जय श्रीराम या विचारधारेला सर्व हिंदूं पर्यंत व्यापक होऊ देऊ नका. तर जय भीम या विचारधारेला एका जाती-समाजापर्यंत सीमित राहू देऊ नका. ती मानवतेची विचारधारा आहे तिला व्यापक बनवा. 
यातच आपले आणि आपल्या देशाचे सौख्य सामावले आहे.

निवड तुमची आहे. तुमच्या निवडीवर तुमचे, येणाऱ्या पिढ्यांचे आणि संपूर्ण देशाचे भविष्य अवलंबून आहे एवढे लक्षात राहू द्या.

मी प्रेम, सहिष्णुता, आपुलकी, समतेची जय-भीम विचारधारा स्वीकारली आहे. तुम्हालाही सस्नेह आमंत्रण. 

तुम्हा सर्वांना प्रेमाचा "जय भीम". 

अजय पाटील
जळगाव.

Monday, November 8, 2021

नोट बंदी चे परिणाम : २०२१ मध्ये घेतलेला आढावा

होय २०१६ मध्ये मोदी सरकारने घेतलेला नोट बंदी चा निर्णय अत्यंत अयोग्य निर्णय होता. हे आता ५ वर्षांनंतर सिद्ध झाले आहे. 
१. या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला मोठा ब्रेक लागला
२. भारताला कोणत्याही मंदीतून सावरण्यासाठी मदत करणारी एक समांतर रोखीने चालणारी अर्थव्यवस्था होती ती पूर्ण बरबाद झाली. मजुरांचे रोजंदारी , किरकोळ खरेदी सर्व रोखीने व्हायची डिजिटल सक्तीमुळे या सर्व व्यवहारांवर , रोजगारावर, नोकऱ्यांवर , उद्योगधंद्यां वर खूप गंभीर परिणाम झाला. 
३. २,००० ची नवीन नोट सुरू केल्यामुळे नोट बंदी पूर्वी असलेल्या रोख चलना पेक्षा अडीच पटीने अधिक रोख रक्कम बाजारात आली. त्यामुळे काळया पैशाला ब्रेक लावण्याची स्कीम पण  पूर्ण फसली.
४. कोणत्याही नव्या नोटा पैसे काढायच्या मशीन मध्ये calibar कराव्या लागतात. हे आर बी आय ला माहिती आहे. त्यात नवे असे काही नाही. तरीही निर्णय रातोरात आणीबाणीच्या पद्धतीने कोणतीही तयारी न करता राबवला गेला. त्यामुळे कोट्यवधी नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. यात हजारो नागरिकांचे प्राण देखील गेले. हा सरकारचा मोठा बेजबाबदारपणा झाला.
५. अतिरेक्यांची भीती दाखवली गेली होती. नव्या नोटा सरकारने उपलब्ध करून दिल्यावर जम्मू काश्मीर मध्ये अतिरेक्यांनी थेट ४/५ बँका लुटून नव्या नोटांचा हा प्रश्न १ महिन्यात सोडवला. सबब हेही कारण पोकळ निघाले.
५. काळा पैसा अडवण्या साठी आणि बाहेर काढण्याची मोठी मोहीम असा दावा मोदींनी केला होता तो पण फुसका बार निघाला. करून ९९.७०% नोटा बँकेत परत आल्या. त्यामुळे काळा पैसा बाहेर आलाच नाही. तो येणारच नव्हता
६. आर. बी आय. ने सल्ला दिला होता की काळा पैसा सोने हिरे दागिने जमिनी या स्वरूपात जास्त आहे. नोट बंदी मुळे हा उद्देश साध्य होणार नाही आणि उलट देशाच्या विकासाला मोठा ब्रेक लागेल. तरीही मोदी सरकारने देशाची गंगाजळी सांभाळणाऱ्या संस्थेचे न ऐकता स्वतःचेच घोडे  दमटले. त्याची फळे आजही भारतातील जनता भोगत आहे. 
७. नोट बंदी मुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीची दरी अजूनही भरून निघालेली नाहीये. देशात स्वातंत्र्य मिळाल्या नंतरची सर्वात मोठी बेरोजगारी निर्माण करणारे सरकार म्हणजे मोदी सरकार इतिहासात अजरामर झाले आहे. महामारी अलीकडे आली. बेरोजगारी रेकॉर्ड स्तरावर महामारी येण्या आधीच गेलेली होती. 
अशी अनेक शेकडो कारणे आहेत. ज्यांचा कोणताही अभ्यास न करता मोदी सरकारने नोटबंदी चां अयशस्वी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची खूप मोठी हानी करणारा निर्णय घेतला हे सिद्ध होते. 
अजूनही सरकारने तज्ज्ञ लोकांचे ऐकून चुका सुधाराव्यात. इंधनाच्या  अवाजवी २३०% टॅक्स गोळा करून तुम्हाला तात्कालिक पैसे मिळतील. पण त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था बेरोजगारी या समस्या  कधीही सुटणार नाहीत. मोदी सरकारने वेळेवर या चुका सुधाराव्यात ही अपेक्षा 🙏🙏