Sunday, May 13, 2018

आरक्षणाचे राजकारण

आरक्षणावर काम करणारे सर्व नेते , अगदी थेट पंतप्रधान , मुख्यमंत्री यांपासून सगळे आरक्षण या मुद्द्यावर गंभीरपणे काम न करता लोकांना फसवत आहेत अशी माझी प्रामाणिक धारणा आहे. कसे ते पुढे सांगतो.

**** मी काम करणाऱ्या लोकांच्या हेतूं वर शंका घेत नाहीये हे आधी स्पष्ट करतो. ****

मुद्दा असा आहे की आरक्षण म्हणजे काय ?
तर समाजातील ज्या ज्या वर्गाची प्रगती झालेली नाहीये किंवा आर्थिक दृष्ट्या त्यांना कोणी वर आणण्याची गरज आहे असे सर्व.

मुळात आरक्षण कायदा काय सांगतो ? ५०% च्या वरती आरक्षण कोणालाही देता येणार नाही. कारण मग जनरल कॅटेगरी चे लोक अल्पसंख्य होतील आणि त्यांनाच आरक्षण द्यावे लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल.

५०% आरक्षण अगोदरच देऊन झालेले असताना जर मुख्यमंत्री आरक्षण देऊ असे आश्वासन देत असेल तर ती वेळ मारून नेण्यासाठी मारलेली निव्वळ थाप आहे. 

उद्या बैठकीत ते आरक्षणाचा ठराव पास करतील. मग तो ठराव केंद्र सरकार कडे पाठवला जाईल. तिथले तज्ज्ञ तो ठराव २०१९ च्या निवडणूका होई पर्यंत घोळवत ठेवतील. शेवटच्या क्षणी कायदेशीर अडचण म्हणून ठराव पुन्हा राज्यसरकार कडे पाठवतील आणि नव्या सरकारच्या माथी ही चूक मारतील.

आरक्षण मुद्द्यावर अतिशय गंभीरपणे या सर्वांनी काम करायचे ठरवले तर फक्त ३० दिवस खूप झाले. पण असे होत नाही. आणि होणारही नाही.

कारण जे नेते आपल्यासाठी आरक्षणासाठी निर्णय घेणार आहेत ते नेते कार आणि विमानातून टॅक्स पेयर्स च्या पर्यायाने आपल्याच पैशांनी फिरतात. या सर्व खर्चासाठी आपण accountable म्हणजेच जबाबदार आहोत असे कोणत्याही लहान मोठ्या नेत्याला वाटत नाही.

आरक्षण हवे असणाऱ्यांनी काय करायला हवे ?

जे नेते तुम्ही निवडून देता त्यांना प्रेमाने विचारत रहा की आरक्षणाचे काय झाले. पाच वर्षांत त्याने आरक्षणाचे उत्तर आणले नाही तर त्याला पुन्हा कधीही जिंकून देऊ नका.

दुसरे काय करता येईल ?
ही नेते मंडळी आपली कामे करत राहतील. त्याला यश येईलही किंवा नाही येणार.
तुम्ही त्यांच्या भरवशावर अवलंबून राहू नका. नुकसान तुमचेच आहे आणि ते भरून देण्यासाठी कोणीही येणार नाही हे लक्षात घ्या. सरकार ने शिक्षण मोफत केलं आहे. त्याचा लाभ घ्या. मोठ्या शाळांत टाकता येत नसेल पण तुमच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये शिकवा. लक्षात घ्या शाळा नव्हे तर तिथे घेतले जाणारे शिक्षण मोठे आहे.
शिकत रहा, स्वतःला मोठे करा, कार्यक्षम बनवा, सरकारी आणि खाजगी क्षेत्रांतून , स्पर्धा परीक्षांना तोंड द्या. स्वतःला लायकी या केवळ एकच निकषावर सिद्ध करा. कोणाचा वशिला वापरू नका. ओळख जरूर वापरा. पण स्वतःला सिद्ध करा. स्वतच्या क्षमता वाढवत रहा.

मग तुमच्या एके दिवशी लक्षात येईन की आरक्षणाची गरज आहे का नाही ते.

प्रयत्न करत रहा. निराश होऊ नका.

आरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या या भाऊंना धन्यवाद आणि शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांना जरूर सांगा की आरक्षण हा भिजत घोंगडे ठेवायचा आणि राजकारणाचा विषय नाही तर तो समाजकारणाचा विषय आहे. लोकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे.

आरक्षण मिळाले तरी ते योग्य लोकांपर्यंत पोहोचले देखील पाहिजे. नाहीतर आपल्या इथे खोटी कागदपत्रे सादर करून लाभ दुसरेच घेऊन जातात. याही बाबीचा विचार बैठकीत जरूर करा..

आरक्षण समितीच्या बैठकीला शुभेच्छा... पण यातून फलित शून्य निष्पन्न होणार आहे याची खात्री आहे.

No comments:

Post a Comment