Tuesday, September 6, 2011

दिनविशेष : ६ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या आठवड्याचे

६ सप्टेंबर
१. सांगली जिल्हयातील ज्येष्ठ वृक्षमित्र व सागरेश्वर अभयारण्याचे शिल्पकार धोंडिराम महादेव मोहिते यांचे निधन. (२०००)
२. मराठी भाषेतील चरित्रकार व संत महिपती बुवा ताहराबादकर यांनी समाधी घेतली. (१७९०)
३. जुन्या जमान्यातील मराठी रंगभूमीवरील अभिनेत्री कमलाबाई (बेबी) गोखले यांचा जन्म. (१९०१)
४. कोल्हापुर संस्थानातील सर्व सार्वजनिक ठिकाणे व विहिरी शाहूमहाराजांनी दलितांसाठी खुल्या केल्या. (१९१९)
५. भारताचे पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले यांचे निधन. १९४८ च्या ऑस्ट्रेलियातील दौर्‍यात ते सहभागी होते. (१९७९)
इतरः
अ. पदार्थाचे सर्वात छोटे मूलकण म्हणजे अणु - या अणुसिध्दान्ताचा जनक जॉन डॉल्टनचा जन्म. (१७७६)
ब. सुप्रसिद्ध जपानी चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांचे निधन. (१९९८)
७ सप्टेंबर:
१. संस्कृतचे गाढे पंडित, आधुनिक मुंबई शहराचा पाया घालणारे कार्यकत्यापैकी एक आणि कुष्ठरोगावर औषधोपचार करणारे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. भाऊ दाजी लाड यांचा जन्म (१८२४)
२. हिंदुस्थानी परंपरेतील सुप्रसिध्द गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म. (१८४९)
३. पहिली स्वदेशी बॅंक प्रस्थापित, बॅंक ऑफ इंडियाची मुंबईत स्थापना. (१९०६)
४. सुप्रसिध्द डॉक्टर व सामाजिक कार्यकत्र्या डॉ. बानू कोयाजी यांचा जन्म. (१९२७)
८ सप्टेंबर:
१. संत मुक्ताबाईचा जन्म. (१२७९)
२. ब्रिटिशाविरुध्दच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ जणांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी देण्यात आले. (१८५७)
३. टिळकांवरील राजदोहाच्या पहिल्या खटल्यास प्रारंभ. (१८९७)
४. शेगावच्या श्री गजानन महाराजांचे महानिर्वाण. (१९१०)
५. मराठी संगीतविश्वावर अविस्मरणिय छाप उमटवणारी पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म. (१९३३)
६. कविवर्य वा. रा. कांत यांचे निधन. (१९९१)
७. पहिल्या महिला जैवरसायनशास्त्रज्ञ डॉ. श्रीमती कमला सोहोनी यांचे निधन. (१९९७)
८. महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे आध्यात्मिक मार्गदर्शक , गुरू रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे निधन. (१९९९)
इतरः
अ. कॅरबियन सागरातील झंझावती वादळाने सागरातच २०० कोटी टन पाऊस पडला, त्यामुळे आलेल्या प्रचंड लाटेन टेक्सासमधील ४५०० व्यक्ती वाहून गेल्या. (१९००)
ब. फिरोज गांधी यांचे निधन. (विमान अपघात? की घातपात? )
९ सप्टेंबर:
१. रविकिरण मंडळाच्या 'किरण' या पहिल्या संग्रहाचे प्रकाशन. (१९२३) - १९२० च्या दशकांत पुण्यातील काही समविचारी कवींनी एकत्र येऊन रविकिरण मंडळ स्थापन केले होते
इतरः
अ. ब्रिटिशांविरुध्द लढणार्‍या तेरा राज्यांच्या युतीस 'युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ' असे म्हणण्याचा निर्णय अमेरिकन कॉंग्रेसने घेतला. (१७७६)
१० सप्टेंबर :
इतर :
अ. कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद यांनी पाकविरुध्दच्या युध्दात खेमकरण विभागात शत्रूच्या रणगाडयांमधून होणार्‍या बॉंबवर्षावाला न जुमानता आघाडीवर असलेला शत्रूचा रणगाडा उद्ध्वस्त केला व लगेच जागा बदलून दुसर्‍या रणगाडयाला नष्ट केले. या कारवाईत त्यांना वीरमरण आले. त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र देऊन गौरविले गेले.
११ सप्टेंबर :
१. भूदान चळवळीचे जन्मदाते आचार्य विनोबा भावे यांचा जन्म. (१८९५)
२. आत्माराम रावजी देशपांडे र्ऊफ कवी अनिल यांचा जन्म. (१९०१)
३. मुंबईत प्रथमच 'बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अ‍ॅड ट्रॅमवेज' या कंपनीकडून विजेचे दिवे लागले. (१९०५)
४. मध्ययुगीन मराठी साहित्य व दख्खनी भाषेचे व्रतस्थ अभ्यासक आणि स्वातंत्र्यसैनिक डॉ. श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांचे निधन. (२००१)
इतरः
अ. वर्ल्ड ट्रेड सेंटरचे मनोरे अतिरेक्यांनी विमाने आदळून उद्ध्वस्त केले. (२००१)

Ashok Patil Replies:
सागर यांच्या या आठवड्याच्या 'दिनविशेष' सदरातील पहिल्याच नोंदीने मला खूप आनंद झाला आहे, हे मुद्दाम नमून करीत आहे.
समाजातील अनेक घटकांसाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून जी लोकोपयोगी कामे चालविली जातात ती प्रामुख्याने 'मुलांमाणसा'साठी असे दिसते. पण धोंडिराम म. मोहिते यानी 'मानव' निर्मित जे 'सागरेश्वर अभयारण्य' निर्माण केले आहे त्याला इथल्या प्रत्येक सदस्याने केव्हा ना केव्हा तरी भेट देऊन त्या "साथी हाथ बढाना" संकल्पनेतून पूर्ण केलेल्या कार्याला तसेच ते करणार्‍या त्या 'वृक्षमित्रा' च्या प्रयत्नास सलाम केलाच पाहिजे असे मला मनापासून वाटते. श्री.मोहिते यांच्या कामाला त्यानंतर त्याचे महत्व जाणून सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावकर्‍यांनीही तितकीच मोलाची मदत केली आहे. मानवनिर्मित अभयारण्यात शासनाच्या वन विभागाने आजुबाजूच्या गावच्या सरहद्दीवरील कित्येक चौ.कि.मी. डोंगरावर असंख्य झाडे लावली असून पर्यावरण समतोलाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य जपले आहे. सुरुवातीच्या काळात या परिसरात अभयारण्य निर्माण करण्याच्या दृष्टीने याच परिसरातील लोकांनी पुढाकार घेऊन डोक्यावरुन पाणी आणून ओसाड डोंगरावर खड्डे खोदले व झाडे जतन केली हे तर केवळ अशक्य वाटणारी बाब. डोंगर कपारीतून झिरपणार्‍या पाण्याचा साठा करून घरी भरलेल्या घागरी आणण्याचे प्रकार आपल्याला माहीत असतात, पण घरात कष्टाने आणलेले पाणी परत डोंगरावर नेऊन ते त्या ओसाड ठिकाणी लावलेल्या झाडांना घालून त्यांचे जतन करणे हा प्रकार केवळ नवलाचा म्हणावा लागेल. वृक्षमित्र मोहिते यानी त्यासाठी कशाप्रकारे गावकर्‍यांना तयार केले असेल याची कल्पनाच केलेली बरी.
या भागाचे आता जंगलात रुपांतर होऊ लागले आहे. अनेक प्रकारचे वृक्ष आणि प्राणी या अभयारण्यात आढळतात. हरण, सांबर, कोल्हे, या प्राण्यांबरोबरच विविध पक्षीही अभयारण्यात मोठया प्रमाणात आहे.
धन्यवाद सागर.

No comments:

Post a Comment